प्रस्तावित पुरंदर विमानतळाला विरोध   

शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांतील शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शविला. गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दांत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध दर्शवित विमानतळासाठी एकही इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
 
पुरंदर विमानतळामुळे ७ गावांतील ८५० कुटुंबे बाधित होत आहेत. या ७ गावांत जवळपास १२ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. विमानतळाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य शासन आणि भूसंपादन अधिकार्‍यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, माजी आमदार संजय जगताप, पुरंदर विमानतळ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग मेमाणे आदींनी मार्गदर्शन केले.  
 
यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले, ‘दरवेळी राज्यकर्त्यांच्या वतीने मी विकास विरोधी असल्याचा गैरसमज पसरवला जातो; मात्र हे विमानतळ प्रस्तावित केले आहे, ते चुकीचे असल्याचे कागदपत्रांसह दाखवून दिले होते. या विमानतळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. विमानतळासाठी आम्ही चाकण तसेच पुरंदर आणि बारामती तालुक्यातील जागा सूचवल्या होत्या. जेथे शेतकरी बाधित होणार नाही. त्या जागांना मान्यता देखील मिळाली होती; मात्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करून येथेच विमानतळ उभारण्याचा घाट घातला आहे. या विमानतळाला लागूनच अदानींचे मोठे लॉजिस्टिक पार्क केले जाणार आहे; मात्र शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारे हे विमानतळ होवू देणार नाही. शेवटपर्यंत तीव्र विरोध करू.’
 
कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग मेमाणे म्हणाले, ‘पुरंदर विमानतळासाठी आमची जमीन द्यायचीच नाही. आम्हाला तुमचा प्रकल्प नको; मात्र शासन दररोज एक-एक आदेश काढत आहे. कोणत्याही परिस्थितीत विमानतळाचा प्रकल्प होऊ देणार नाही, तसेच सर्व्हे करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, ड्रोन अथवा पीक पाहणी करून देणार नाही.’
 
माजी आमदार संजय जगताप म्हणाले, तांत्रिकदृष्ट्या या परिसरात हे विमानतळ होणे शक्य नाही, असे तज्ज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील इतर जागा सुचवल्या आहेत. त्याचबरोबर बारामती तालुक्यातील जागाही योग्य असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र शासन ऐकायला तयार नाही. त्यामुळे या सर्व शेतकर्‍यांसह आम्ही विमानतळाला विरोध करणार आहोत.
 
पुरंदर विमानतळाला विरोध असताना जमीन संपादित कशी काय केली जाते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विमानतळ जागेचे भूसंपादन करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे, तसेच या सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत जमिनीच्या सातबारा उतार्‍यांवर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात येणार असून शेतकर्‍यांना नोटीसा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झाला आहे. आमचा या विमानतळाला विरोध असताना आमच्या हक्काची जमीन संपादित कशी केली जाऊ शकते? असा सवालही शेतकर्‍यांनी उपस्थित केला.
 

Related Articles